पऱ्हर बुद्रुकच्या वस्त्यांवर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचला नळ; महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबली
भोर : तालुक्याच्या नीरा – देवघर धरण खोऱ्यातील पऱ्हर बुद्रुक (ता. भोर) ग्रामपंचायतीमधील कचरे वस्ती आणि उंबरटकर वस्ती या प्रथमच टँकरमुक्त झाल्या आहेत. यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी महेश कालेकर यांनी पुढाकार घेऊन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाय शोधला. त्यांच्या प्रयत्नाला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी पंचायत समितीच्या सेस निधीतून १ लाख ३० हजारांचा निधी दिला. यामुळे दरवर्षी कचरे वस्ती आणि उंबरटकर वस्तीला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रथमच बंद झाले आहे.
अतिदुर्गम भागामुळे दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई…
पऱ्हर बुद्रुक हे भोर तालुक्यातील अतिदुर्गम भागात आहे, तिथे पावसाची कमतरता नाही परंतु भौगोलिक परिस्थितीमुळे येथील कचरे वस्ती आणि उंबरटकर वस्तीला दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामना करावा लागतो. गावात जल जीवन मिशन हो योजनाही राबवली गेली. मात्र, वस्त्यांचे अंतर गावापासून दूर असल्यामुळे तिथपर्यंत पाणी पोहोचायला निधी कमी पडला.
ग्रामपंचायत अधिकारी कालेकर यांचा या अडचणीवर कल्पक उपाय…
याची माहिती घेऊन ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी कालेकर यांनी या अडचणीवर कल्पक उपाय शोधला. धरणांमधील पाणी संपल्यावर सुद्धा काही जिवंत झरे उन्हाळ्यात तग धरतात. कालेकर यांनी गावकऱ्यांच्या माध्यमातून छोटा बंधारा बांधला आणि पाणी अडवले, पाण्याचा पुरेसा साठा तयार झाला.
कालेकर यांच्या कल्पकतेला गटविकास अधिकाऱ्यांची साथ…
परंतु वस्तीपर्यंत पाणी नेण्यासाठी पाइपलाइनची आवश्यकता होती. गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी पंचायत समितीच्या सेस निधीतून १ लाख ३० हजारांचा निधी दिला. त्यामुळे पाइपलाइनचे काम पूर्ण झाले. झऱ्याचे पाणी विहिरीत आले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कचरे वस्ती आणि उंबरटकर वस्ती येथे पाण्याचा नळ पोहोचला. यामुळे या वस्तीमधील ग्रामस्थांची विशेषतः महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबली आहे.