भोर तालुक्यातील करंजेत गारपिटीच्या तडाख्यात शेतकऱ्याचा मृत्यू
भोर : तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबवडे खोऱ्यातील करंजे येथील शिवारात कलिंगड लागवड केलेल्या शेतात काम करत असताना अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठा तडाखा दिला. गारांच्या जोरदार माऱ्यामुळे राजेंद्र लक्ष्मण कुडले (वय ४९, रा. करंजे) या शेतकऱ्यांची प्रकृती खालावली आणि उपचारासाठी नेत असताना त्यांचा मार्गातच मृत्यू झाला.
दरम्यान, तालुक्यात वीसगाव, चाळीसगाव तसेच पूर्व पट्ट्यातील अनेक गावांमध्ये जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या पावसामुळे शेतांमध्ये गारांचा खच साचला होता. काढणी केलेली पिके पाण्यात भिजली तर उभी पिके वाऱ्यामुळे आडवी झाली.
अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.





