आपत्ती काळात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही; भोरमध्ये डॉ. विकास खरात यांचा अधिकाऱ्यांना इशारा
भोर : आगामी पावसाळ्याचा विचार करता भोर तालुक्यातील सर्व शासकीय विभागांनी नैसर्गिक आपत्तींसाठी पूर्ण सज्ज रहावे, असा स्पष्ट इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिला आहे. प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनंत साबणे, वन विभागाच्या उपविभागीय अधिकारी शीतल राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवम शेंडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजसाहेब आगळे, राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता ए. डी. सुर्वे, जलसंपदा विभागाचे गणेश डेंगळे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. खरात यांनी भर दिला की, भोर व परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी, विशेषतः कापूरहोळ-भोर-मांढरदेवी-वाई आणि शिंदेवाडी-वरंधा घाट मार्गांवर, धोकादायक ठिकाणी योग्य त्या सुरक्षा उपाययोजना तात्काळ राबवाव्यात.
तालुक्यातील अनधिकृत आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या होर्डिंग्ज तातडीने हटवाव्यात, अन्यथा दुर्घटना घडल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा ठाम इशाराही त्यांनी दिला. आपत्ती काळात प्रत्येक विभागाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी आणि संभाव्य संकटांचा मुकाबला करण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.