धांगवडीच्या शेतात रासायनिक टँकर ओतल्याची घटना; निनाद महाराष्ट्र न्यूजचे वार्तांकन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखल
कापूरव्होळ : पुणे-सातारा महामार्गावरील धांगवडी (ता. भोर) गावातील एका शेतात मंगळवारी (दि. २७ जून) रात्री अज्ञात व्यक्तींनी रासायनिक टँकर ओतल्याच्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे पाण्याच्या स्रोतांना आणि जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरले.
ही घटना निनाद महाराष्ट्र न्यूजने सर्वप्रथम उघडकीस आणली. या बातमीची दखल घेत आज शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे.
धांगवडी गावचे सरपंच सचिन तनपुरे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अजय खामकर व सर्जेराव भोई यांनी शेतातील दूषित पाण्याचे नमुने संकलित केले. यावेळी त्यांनी सांगितले, “हा प्रकार अतिशय गंभीर आहे. जमिनीत ओतले गेलेले रसायन ओढ्याद्वारे नदीपर्यंत पोहोचू शकते, ज्याचा जैवविविधता आणि पिण्याच्या पाण्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. नमुन्यांची सखोल रासायनिक तपासणी करण्यात येणार असून, त्यावर आधारित योग्य उपाययोजना राबवण्यात येतील.”
या दरम्यान भोर उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी देखील या घटनेबाबत केमिकलचे स्वरूप स्पष्ट होताच पुढील दिशा ठरवण्यात येईल असे सांगितले. या घटनेने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींना शोधून काढून तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.