भरधाव ट्रकने घेतले दोन तरुणांचे प्राण; वेळूतील विचित्र अपघाताने खळबळ, नेमकं काय घडलं?
खेड शिवापूर : पुणे-सातारा महामार्गावर वेळू (ता. भोर) येथे बुधवारी (दि. ३० जुलै) सकाळी सव्वानऊच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने अचानक विरुद्ध दिशेच्या लेनवर घुसून अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघांना गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. गोरक्षनाथ बाबासाहेब खुटवड (वय ४९, रा. उंबरे, ता. भोर) यांनी याबाबत राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ट्रक चालक मेहताब अलो दफादार (वय ४६, रा. पश्चिम बंगाल) याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खुटवड हे नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी त्यांच्या मोटारसायकल (एम.एच.१२ एम.वाय.१४५५) वरून जात असताना वेळू गावच्या हद्दीतील डब्ल्यू.ओ.एम. कंपनीसमोर पुण्याकडून साताऱ्याकडे भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक (एम.एच. ०४ के.यु. ११४४) ने विरुद्ध लेनमध्ये घुसून फिर्यादींच्या दुचाकीसहित कंटेनर (के.ए. ५१ ए.के. ६११९), पिकअप (एम.एच. १२ जे.एफ.५२८८) आणि दोन दुचाकींना (एम.एच.१० डी.एक्स. ५६९४, एम.एच. १० बी.बी.३९९९) धडक दिली. यामध्ये ट्रकने दोन दुचाकीस्वारांना फरफटत नेले आणि त्यानंतर पलटी झाला.
अपघातग्रस्तांना तत्काळ डब्ल्यू.ओ.एम. कंपनीच्या रुग्णवाहिकेद्वारे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. परंतु या भीषण अपघातात प्रथमेश महादेव रेडेकर (वय ३२, रा. सांगली) व दिव्यम सुनिल निकम (वय ३१, रा. धुळे) या दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. तर पिकअप चालक संजय श्रीरंग खाटपे (वय ४२, रा. हिंगे वाठार, ता. भोर) यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापती झाली असून त्यांच्यावर भारती हॉस्पिटल, पुणे येथे उपचार सुरू आहेत. या घटने बाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.