आता ‘या’ लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी मिळणार फक्त ५०० रुपये; नेमकं काय आहे यामगचं कारण?
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली होती. ज्याचा निवडणुकीत महायुती सरकारला मोठा फायदाही झाला. दुसरीकडे, निवडणुकीच्या काळात महिलांना २१०० रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्याचे आश्वासनही महायुतीकडून अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. मात्र दरमहा १५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होत आहे.
एप्रिल महिन्याचा हफ्ता अक्षय्य तृतीयेला होणार जमा
त्यानंतर आता एप्रिल महिन्याचा हफ्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होतील, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. मात्र त्यापूर्वी या योजनेबाबत एक माहिती समोर आली आहे.
८ लाख महिलांना केवळ ५०० रुपयेच मिळणार
या योजनेअंतर्गत सरकारकडून करण्यात आलेल्या छाननीनंतर आता ८ लाख महिलांना केवळ ५०० रुपयेच मदत मिळणार आहे. हा निर्णय एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात आला असून, अनेक महिलांना याचा फटका बसणार आहे.
… या दोन योजनेंचा लाभ घेणाऱ्या महिलांना मिळणार केवळ ५०० रुपये
एकाच व्यक्तीला वैयक्तिक लाभाच्या केवळ एका योजनेचा फायदा घेता येतो. पण अनेक महिला एकाच वेळी शेतकरी सन्मान निधी आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. याच पार्श्वभूमीवर सरकारने छाननी केली असता, ज्या महिला दोन्ही योजना घेतात त्यांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून केवळ ५०० रुपयेच मिळतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील ८ लाख महिलांना नमो शेतकरी कार्यक्रमांतर्गत १ हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जातो. त्यामुळे अशा महिलांना जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना केवळ ५०० रुपयांचा हप्ता मिळणार आहे. अशा महिलांच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात कपात केली जाणार आहे. दुहेरी लाभ टाळण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजनेतून मिळणाऱ्या रकमेची कपात करून ती फक्त ५०० रुपये करण्यात आली आहे.