नसरापूर-चेलाडी फाट्यावरील ऐतिहासिक स्वराज्य शपथ स्तंभ परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी शिवप्रेमी आक्रमक; २४ एप्रिलला करणार उपोषण 

मुख्य संपादक : दिपक महांगरे 

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर-चेलाडी (ता. भोर) फाट्यावरील ऐतिहासिक स्वराज्य शपथ स्मारक स्तंभाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे परिसरात अतिक्रमणे व घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन स्तंभाची दुरावस्था झाली आहे. हा स्तंभ शिवभक्तांसाठी स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि संस्कृतीचा साक्षीदार असून अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर गुरुवारी (दि. २४ एप्रिल) सकाळी ११ वाजता प्रहार जनशक्ती पक्ष भोर तालुका अध्यक्ष अजय कांबळे, वीर धाराऊ माता गाडे यांचे वंशज अमित गाडे, स्वप्नील गाडे, निलेश कदम व शिव प्रतिष्ठान भोर यांच्यावतीने जो पर्यंत अतिक्रमणे हटवणार नाही, तोपर्यंत उपोषण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

असे आहे या स्वराज्य शपथ स्मारक स्तंभाचे महत्व

नसरापूर-चेलाडी फाट्यावर भोर संस्थांनचे राजे श्रीमंत रघुनाथराव पंतसचिव यांनी छत्रपती शिवरायांनी श्री रायरेश्वरावर १६४५ साली हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेल्या ऐतिहासिक घटनेस तीनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी १९४५ साली हा स्वराज्य शपथ स्मारक स्तंभ उभारला. एका दगडी चौथऱ्यावर खाली चौरस, मग अष्टकोनी आणि वर गोल असा हा स्तंभ आहे. या स्तंभाखाली तत्कालीन भोर संस्थानात असणाऱ्या किल्ल्यांची नावे आणि त्यांची मैलात असलेली अंतरे त्या-त्या दिशेला संगमरवरी पट्टीवर कोरलेली आहेत.

हा स्तंभ चेलाडी फाट्यावरच का उभारला? 

Advertisement

असे सांगितले जाते की, तोरणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी याच ठिकाणी बसून डावपेच आखले. स्वराज्याचा श्रीगणेशा ज्या जागी झाला तिथेच त्याचे स्मारक हवे म्हणून भोरच्या संस्थानिकांनी हे स्मारक इथे उभारले. स्तंभावर भवानी देवीच्या पूजेचा प्रसंग कोरण्यात आला आहे. त्याखाली त्याची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला हाच मजकूर इंग्रजी भाषेत असून धनुष्यबाण आणि बाणाचा भाता कोरलेला दिसतो.

भोर संस्थांनच्या राजेंनी ब्रिटिश राजवटीतही मोठ्या धाडसाने उभारला हा स्तंभ

भोर संस्थांनचे राजे श्रीमंत रघुनाथराव पंतसचिव यांनी ब्रिटिश राजवटीत हा स्तंभ उभारला. स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या ठिकाणी रोवण्यात आली त्या ठिकाणी ब्रिटिश राजवटीत एखाद्या संस्थानिकाने असे स्मारक उभारणे धाडसाचे होते. स्तंभावर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेला प्रसंग आणि शिवरायांची राजमुद्रा कोरलेली आहे. जवळपास ९ मीटर म्हणजे ३० फूट उंचीचा हा स्तंभ आहे. 

वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही नाही… त्यामुळे घेण्यात आला आंदोलनाचा पवित्रा

अशी प्रेरणादायी ऐतिहासिक वारसा स्थळे प्रशासनाने जपणे गरजेचे आहे. परंतु दुर्दैवाने, या पवित्र ऐतिहासिक स्मारकाभोवती अतिक्रमणाचे साम्राज्य पसरले असून या ठिकाणी अस्वच्छता व बेफिकिरीचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर गोष्टीकडे तातडीने लक्ष घालून अतिक्रमण तात्काळ हटवून हा ऐतिहासिक ठेवा भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी निवेदनाद्वारे वारंवार केली. परंतु संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर गुरुवारी (दि. २४ एप्रिल) सकाळी ११ वाजता चेलाडी फाट्यावरील स्मारकस्थळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपोषणकर्त्यांनी निनाद महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page